नवी दिल्ली - 13 जुलै 2011 रोजी मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटातील दोन आरोपी दिल्ली पोलिस आणि केंद्रीय गुप्तचर विभागाचे खबरी असल्याचा दावा करण्यात आल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात गृहमंत्रालयाने एटीएस प्रमुख राकेश मारिया यांची कानउघाडणी केल्याचे वृत्त आहे. बनावट नोटाप्रकरणी अटकेत असलेल्या एका आरोपीचा ताबा मिळण्याची मागणी महाराष्ट्र "एटीएस'ने दिल्ली पोलिसांकडे केली आहे. त्याचा मुंबईतील बॉम्बस्फोटाशी संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे. "एटीएस'ने पत्रकार परिषदेत सांगितलेल्या दोन फरारी दहशतवाद्यांमध्ये त्याचा समावेश आहे. यासंदर्भात माहिती देताना गृहमंत्रालयातील एक वरिष्ठ अधिकारी म्हणाला,""22 वर्षीय नकी अहमद अली अहमद शेख आणि आणखी एका आरोपी दिल्ली पोलिसांचे खबरी आहेत. 13/7 बॉम्बस्फोटातील दोन आत्मघातकी वकास आणि तबरेज यांच्यासंदर्भात शेखने पोलिसांना महत्त्वपूर्ण माहिती पुरविली आहे. या दोघांबाबत माहिती मिळविण्यासाठी शेख मुंबईत गेला होता. केंद्रीय गुप्तचर विभागाने आखलेली ही सर्वांत महत्त्वपूर्ण योजना होती.