मुंबई - राज्यातील निवडणूक यंत्रणेचा आढावा घेताना मतदारांना दारू व मटण पार्ट्यांचे आमिष दाखविण्याच्या अनेक तक्रारी आल्या असून, त्याबाबतची वृत्तेही छापून आली आहेत. मतदारांच्या दृष्टीने ही बाब अत्यंत क्लेशदायक असल्याने राज्य उत्पादनशुल्क विभागाच्या आयुक्तांना दारूच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी प्रसारमाध्यमांना दिली. निवडणूक प्रचारादरम्यान शेजारच्या राज्यांमधून दारूची अनधिकृत वाहतूक रोखण्यासाठी कडक उपाययोजना आखाव्यात, त्यासाठी राज्यांच्या सीमा बंद कराव्यात, तसेच राज्यातील उपलब्ध दारू साठ्याचे व्यवहार चोख ठेवण्याच्या सूचनाही उत्पादनशुल्क आयुक्तांना केल्याची माहिती सत्यनारायण यांनी दिली. त्यासाठी आवश्यकतेनुसार पोलिसांची मदत घ्यावी, असेही सत्यनारायण यांनी आयुक्तांना सुचविले. दारू-मटणाच्या पार्ट्यांबरोबरच मतदारांना पैठणी साड्यांचे वाटप, मतदारांचे ऍडव्हान्स टॅक्स भरणे किंवा सहली आयोजित करून त्यांना प्रलोभने दाखविण्याची नवी शक्कल उमेदवारांकडून लढविली जात असल्याबाबत निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.