कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचे 2011-2012 चे सुधारीत आणि 2012-2013 चे अंदाजपत्रक आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी परिवहन समिती सभापती सुधीर पाटील यांना सादर केले. 48 कोटी 52 लाख 30 हजार रुपये ही जमेची बाजू तर 48 कोटी 50 लाख 54 हजार रुपये खर्च दाखविण्यात आलेले अंदाजपत्रक हे एक कोटी 76 लाखांचे शिलकी अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे परिवहनमधील तिकीट घोट्याळास आळा घालण्यासाठी कल्याण-भिवंडी मार्गावर ई तिकीट प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. एप्रिलपासून ही प्रणाली सर्वच मार्गांवर सुरू करण्यात येणार असल्याचे आयुक्त सोनवणे यांनी सांगितले. परिवहन उपक्रमात 145 बस असून त्या 40 ते 45 मार्गांवर धावतात. परिवहन सेवेतून दिवसाला 80 हजार प्रवासी प्रवास करतात. उपक्रमाचे दैनंदिन उत्पन्न पाच लाखांच्या आसपास आहे. परिवहनचे उत्पन्न कमी झाले होते. कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याने दररोजच्या उत्पन्नात लाखाने वाढ झाली आहे. पहिल्या टप्प्यातील 40 बसचे आयुर्मान संपुष्टात आल्याने त्या भंगारात काढण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्रुत्थान अभियानांतर्गत 50 बस दाखल होणार आहेत.