मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत काही स्थानिक मंडळांचा भाव चांगलाच वधारला आहे. अशा काही मंडळांकडून उमेदवारांकडे दोन ते तीन लाख रुपयांची मागणी होत आहे. या मंडळांच्या वाढत्या मागणीमुळे उमेदवारही पेचात पडले आहेत. महिला आरक्षणामुळे निवडणुकीच्या रणांगणात यंदा महिला मंडळेही उतरणार आहेत. निवडणुकीला उभ्या राहणाऱ्यांपैकी अनेकांनी विभागातील काही मंडळे हाताशी बांधलेली असतात मात्र यंदा आरक्षणामुळे अनेक नगरसेवकांचे वॉर्ड बदलले आहेत. तसेच अनेक नवखे उमेदवारही रिंगणात उतरत आहेत. यामुळे काही स्थानिक मंडळांनी या वाहत्या गंगेत हात धुऊन घेण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या महागाईबरोबरच मंडळांनी त्यांचा "भाव' वाढवला आहे. नवख्या उमेदवारांनी या मंडळांच्या अध्यक्ष तसेच सचिवांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत मात्र मंडळांनी टाकलेला आकडा ऐकून उमेदवारही आवाक् होत आहेत. मंडळाचा "भाव' हा त्यात असलेले कार्यकर्ते, त्या परिसरात असलेले मतदार यावर ठरतो. पूर्वी पुरुषांच्या मंडळांची या तोडपाण्यात वरचष्मा होता. आता 50 टक्के महिला आरक्षण आल्याने महिला मंडळांनाही भाव आला आहे.